Tuesday, 1 January 2013

for my brave friends....and their unparalled love

मीच माझी हैराण होते,प्रत्येक श्वासापरी स्तब्ध होते
हे कसं शक्य आहे – न जाणे स्वतःलाच कितीदा विचारते...
मी जिवंत आहे ? तुझ्या नंतरही आयुष्य जगते आहे ?!
चालते आहे,बोलते आहे, कधी कधी तर हस्तेही आहे!

"तू नाहीएस” मला कळलं नाहीये का ?
तुझं अचानक जाण फक्त एक भयंकर स्वप्नं आहे, मला असं वाटतंय का ?
कश्यावर विश्वास ठेवू ? तुझ्या जाण्यावर कि माझ्या जगण्यावर ?
अर्धवट डाव मोडण्यावर कि तरीही खेळ चालूच राहिल्यावर ?

कितीदातरी शून्यात हरवते...वाटतं काळ थांबला कि मागे फिरेल....
पुन्हा तू असशील , मी असीन,आपला संसार असेल...
तुला माझा संवाद कळेल किंवा बोलले नाही तरी प्रतिसाद मिळेल
मी आणि मुलं नेहमीसारखे तुझ्या मिठीत विरघळू ...आणि थोडावेळ काळही फसेल...

पण असं होत नाही रे....तुझा घट्ट धरून ठेवलेला हात नकळत निसटून जातो...
कितीही साद घातली तरी उलटून माझाच श्वास येतो...
बेभान होवून शोधलं तरी हाती भासच येतात
त्यांना जपून ठेवाव म्हंटल तर तेही नाहीसे होतात...

दिवस कसातरी निघून जातो......रात्र वैऱ्याची ठरते..
"पहिल्या रात्री" पासूनची प्रत्येक घटका आठवते..
आपल्या नात्याचा हर एक पैलू मी पुन्हा पुन्हा उलगडते...
मित्र,नवरा,मुलगा, बाबा,सगळ्यांना त्यात भेटते...

मुलांचे मूक प्रश्न,त्यांना काय उत्तर देवू ?
तू किती लांब गेला आहेस, मी कसं समजावून सांगू ?
तुझ्याशी त्यांचं नात आता फक्त आठवणीतल का रे ?
"आपला बाबा असा होता" आता फक्त गोष्टितल ना रे !

पण थांब…...माझ्या सारखा तुही असाह्य दिस्तोयेस...
माझा अबोल आक्रोश तुझ्या कंठातून निघतोय...
निघून तर गेला आहेस,पण 'जाता' येत नाहीये...
मी,मुलं, समोर दिसतोय, पण घरी येता येत नाहीये...!!

स्वतःच्या दुक्खात किती स्वार्थी झाले मी
ज्याचं सारं लुटलं,त्यालाच दोषी ठरवलं मी !
सारं सोडून, सारं गमावून एकाट वाटा तुझ्या आहेत..
आशेनं ज्यांच्या कडे बघाव, माझ्या कुशीत तर आपली मुलं आहेत....

खरच चुकलं माझं...तुला अडकवून ठेवलं मी..
माफ कर राजा तुला जकडून ठेवलं मी...
आज पहिल्यांदा तुला निरोप देते....साऱ्या बंधनातून मुक्त करते..
काळजी करू नकोस मी सगळं सांभाळीन - तुला आश्वासनही देते....

आपल्या दोघांची सारी स्वप्नं मी पूर्ण करीन
तुझं प्रत्येक अपुरं कर्तव्य मी पार पाडीन
तू दाखवलेली दिशा आपल्या मुलांचा मार्ग बनेल
तुझी आठवण अडथळा नाही आम्हा सगळ्यांचा आधार ठरेल

तुला सारं काही सांगीन ,पण प्रश्न विचारणार नाही...
रोज तुला स्वप्नात बघीन,पण सत्य विसरणार नाही...
अवघड वाटेवर डगमगणार नाही..आणि अडखळेच तरी पडणार नाही...
मनापासून सांगते - सख्यारे निवांत नीज....तुझ्या गाढ झोपेतून आता तुला उठवणार नाही.

No comments:

Post a Comment